लातूर /प्रतिनिधी: तिरंगा झेंडा हा प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान आहे .तिरंगा डौलाने फडकत असलेला पाहून प्रत्येकाचाच हात अभिमानाने सलामी देण्यासाठी वर उचलला जातो. विविध शासकीय कार्यालयावर आणि राष्ट्रीय सणांना फडकवला जाणारा हा तिरंगा आता लातूर जिल्हा क्रीडा संकुलावर कायम फडकत राहणार आहे .
एवढेच नाही तर शहर व परिसरात कुठूनही तो पाहता येणार आहे . पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची सूचना व जिल्हाधिकारी जी .श्रीकांत यांच्या प्रयत्नातून क्रीडा संकुलावर 45 मीटर उंचीचा तिरंगा फडकावण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे .
शहरासह परिसरातील गावातूनही दिसावा एवढ्या उंचीचा तिरंगा लातुरात असावा अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली होती .जिल्हाधिकारी जी . श्रीकांत यांनी ती सूचना लक्षात घेऊन तातडीने पावले उचलली. एवढ्या मोठ्या उंचीचा तिरंगा ध्वज फडकावण्यासाठी केंद्र शासनाची परवानगी घ्यावी लागते .त्यानुसार ती मिळवण्यात आली .शिवाय हा ध्वज फडकवण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली .
यामुळे येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी 45 मीटर उंच तिरंगा झेंडा जिल्हा क्रीडा संकुलावर फडकणार आहे. कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून लोकप्रिय झालेल्या जिल्हाधिकारी जी . श्रीकांत यांनी या माध्यमातून लातूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्याचे काम केले आहे .यामुळे जिल्ह्यातील नागरिक पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक करीत आहेत.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment