विरोधीपक्षनेते धनंजय मुंडेंच्या विरोधात फसवणूक प्रकरणी दोषारोपपत्र दाखल.

Wednesday, January 2, 2019
अंबाजोगाई : तालुक्यातील पुस येथील जगमित्र साखर कारखाना उभारणीसाठी येथील शेतकरी मुंजा किशनराव गित्ते (रा.तळणी ता.अंबाजोगाई) या शेतकऱ्याची जमीन खरेदी करण्यात आली होती. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्याला चाळीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. हा धनादेश न वटल्यामुळे विरोधी पक्ष नेते धंनजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करून धनंजय मुंडे यांच्यासह कारखान्याचे संचालक वाल्मीक कराड, सूर्यभान मुंडे यांच्या विरोधातील दोषारोपपत्र अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले आहे. दरम्यान अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड यांनी या प्रकरणात तिघांना नोटिसा काढल्या आहेत.

पुस येथील जगमित्र साखर कारखान्यास दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटीचा ४० लाख रुपयांचा धनादेश न वटल्या प्रकरणी या अगोदर बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सरकारी वकिलाने खंडपीठाची ऑर्डर शासनाकडे पाठवली. त्यानंतर खंडपीठाच्या ऑर्डरला राज्यपालांनी दोषारोपपत्र दाखल करण्याची मान्यता दिल्यानंतर परत हा प्रस्ताव मुख्य सचिव पोलिस महासंचालकांकडे पाठवला गेला. 

त्यानंतर बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे दोषारोप पत्राचे आदेश पाठवले. २६ रोजी सर्व प्रकिया पूर्ण होऊन अखेर अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात मुंडे यांच्यासह तीन जणांवर दोषारोप पत्र दाखल झाले आहे. या प्रकरणात परळी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे यांनी शेतकरी मुंजा गित्ते यांच्या बाजूने पाठपुरावा केला आहे.

माझी जमीन घेऊन फसवणूक झाली आहे. मुलांनाही नोकऱ्या मिळाल्या नाहीत. आता कारखाना होईल की नाही हे नक्की नाही .माझ्या जमिनीचे पैसे बाजारभावाप्रमाणे मला मिळाले पाहिजेत. सहा वर्षात माझे नुकसान झाले असून मला न्याय मिळाला पाहिजे. - मुंजा किशनराव गित्ते, शेतकरी

No comments:

Post a Comment