भाजपा फावडं आणि कुऱ्हाड एकाचवेळी पायावर मारुन घेणार नाही : राज ठाकरे

Saturday, December 22, 2018

दंगली घडवण्याचा सरकारचा कट

नाशिक : लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेणं म्हणजे भाजपसाठी फावडं-कुऱ्हाड एकाचवेळी पायावर मारुन घेण्यासारखं आहे. त्यामुळे लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार नाहीत, असा अंदाज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्तवला. राम मंदिराच्या मुद्द्यावर सरकारला दंगली घडवायच्या आहेत असा आरोपही त्यानी केला .
नाशिकच्या दौऱ्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांना संबोधित केले .यावेळी ते बोलत होते .


साहजिकच मुलाच्या लग्नाचा विषय यावेळी निघाला .मुलगा अमितचं लग्न अत्यंत साधेपणानं होणार असल्याचं ठाकरेंनी यावेळी सांगितलं. सर्वपक्षांच्या हितचिंतकांना आमंत्रण दिलं, तर तो आकडा सहा लाखांच्या घरात जातो. त्यामुळे वधू-वराची ससेहोलपट नको म्हणून मोजक्याच लोकांना निमंत्रण दिल्याचंही राज म्हणाले.
भाजप फावडं आणि कुऱ्हाड एकाचवेळी पायावर मारुन घेणार नाहीत. त्यामुळे आधी फावडं मारुन घेतील, नंतर कुऱ्हाड असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलं.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्याचं बाळा नांदगावकरांनी मला सांगितलं होतं. तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती- मोदींनी आपला राजकीय खड्डा खणला. नोटाबंदीच्या वाईट परिणामांबद्दल सांगणारा मी पहिलाच होतो. भाजप स्वतःच स्वतःचे राजकीय खड्डे खणत आहे, निवडणुका जवळ येतील, तसतसे सत्ताधारी आणखी चुका करतील, असंही ठाकरे म्हणाले.

आधी पैसे काढले, आता लोकांच्या घरात घुसणार का? असं म्हणत मोबाईल कॉल आणि इंटरनेट डेटावरील सरकारी पहाऱ्यावर राज यांनी संताप प्रदर्शित केला.राम मंदिरावरुन दंगली घडवण्याचा सरकारचा कट आहे. सरकारकडे रुपयाही शिल्लक नसून केवळ घोषणाबाजी सुरु आहे. पैसा नाही, मग कशाच्या जोरावर कांद्याला अनुदान जाहीर केलं? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

या दौऱ्याला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या गर्दीवरुन जनतेचा शिवसेना-भाजपवरील विश्वास उडाल्याचं दिसत असल्याचं ते म्हणाले. येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची दुर्दशा होईल, असं भाकितही त्यांनी वर्तवलं. तीन राज्यांमधील पराभव हा मोदींवरचा राग आहे. जनतेने आपला राग मतांच्या माध्यमातून व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचं सरकार बेकार आहे असंही राज ठाकरे म्हणाले.

No comments:

Post a Comment