लातूरला उजनीच्या पाण्यासंदर्भात दानवेंचे मोठे विधान

Sunday, November 25, 2018




लातूर /प्रतिनिधी: सत्तेत असतानाही काँग्रेसच्या नेत्यांनी लातूरच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला नाही .लातुरच्या प्रश्नावर चर्चाही झाली नाही .पाण्याचा प्रश्न त्याच वेळी सोडवला असता तर आजसारखी परिस्थिती उद्भवली नसती. तरीही लातूरचे हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने लातूर अजेंड्यावर घेतले असून विकासाचा बॅकलॉग भरून काढू .लातूरच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी लातूरला उजनीचे पाणी देणारच असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले .

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानवे सध्या राज्याचा दौरा करीत आहेत. विदर्भ ,उत्तर महाराष्ट्र तसेच कल्याण-ठाणे भागाचा दौरा केल्यानंतर चौथ्या टप्प्यात लातूरसह उस्मानाबाद ,परभणी ,हिंगोली व नांदेडचा दौरा ते करत आहेत .

यावेळी बोलताना दानवे पाटील म्हणाले की ,लातूर हे राज्य सरकारच्या अजेंड्यावर आहे .याच दृष्टिकोनातून लातूरला मेट्रोचा कारखाना दिला असून राष्ट्रीय महामार्गाची कामे गतीने सुरू आहेत .लातूरच्या विकासाचा बॅकलॉग आम्ही भरून काढणार असल्याचे ते म्हणाले.
राम मंदिर हा काही नवा मुद्दा नाही तसेच तो निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही .काल अयोध्येत उद्धव ठाकरेंनी केलेले भाषण ही राजकीय स्टंटबाजी आहे . यामुळे भाजपाचे नुकसान होणार नाही तर फायदाच होईल असे ते म्हणाले .काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर जनतेला विश्वास नाही.

त्यामुळे त्यांची आघाडी झाली तरीही मागच्यावेळी पेक्षा जास्त जागा जिंकून भाजपा केंद्र व राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करेल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला .समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मत विभाजन होऊ दिले नाही तर दोन्ही पक्षांचा फायदा होतो असे सांगून आपण युती करण्याच्या बाजूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे असा ठराव पक्षाच्या कार्यकारणीत घेणारा भाजपा हा एकमेव पक्ष आहे .

सरकारने देऊ केलेले आरक्षण कोर्टात निश्चितपणे टिकणारे आहे .मागच्या सरकारने केवळ अध्यादेश काढला होता .भाजपा सरकार हा कायदा करत असल्याचे ते म्हणाले .वोट बँकेचे राजकारण आता संपले असून विकासाला प्राधान्य दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकार विकासाची कामे करत आहे. यामुळेच जनता प्रत्येक निवडणुकीत भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून पसंती देत आहे .

विकासाच्या दृष्टीने मुंबई दिल्ली-मुंबई कॉरिडॉर व विविध शहरात मेट्रोची कामे सुरू आहेत. भाजपाच्या नेतृत्वातील सरकारचे काम चांगले असल्याने आम्ही पुन्हा बहुमताने सत्तेत येऊ असे ते म्हणाले .
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 288 विधानसभा मतदारसंघात पूर्णवेळ विस्तारक नेमले आहेत .48 लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र विस्तारक आहेत . 

92 हजार बुथ प्रमुखापैकी 88 बुथ हजार प्रमुखांची नेमणूक झाली आहे .त्यापैकी 83 हजार बूथ प्रमुख वॉररूम मधून कन्फर्म झाले असून त्यांना प्रशिक्षण दिले आहे .वन बुथ 25 युथ तसेच पन्ना प्रमुखांची नेमणूक केली आहे .हा पन्ना प्रमुख साठ मतदारांवर लक्ष ठेवणार आहे .पक्षाने उभारलेल्या यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी हा दौरा असून या कामावर आपण समाधानी आहोत. डिसेंबर महिन्यात उर्वरित जिल्ह्यांचा दौरा पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. 

एकेकाळी भाजपाला उमेदवार मिळत नव्हते आता मात्र उमेदवारी मागण्यासाठी रांगा लागल्या आहेत .पक्षाला चांगले दिवस आले आहेत. इच्छुकांची संख्या मोठी असून उमेदवारीचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेणार आहे .माझी उमेदवारीही मी स्वतः जाहीर करू शकत नाही ,असे ते म्हणाले .
या पत्रकार परिषदेस पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर ,खासदार डॉ. सुनील गायकवाड ,आ. विनायकराव पाटील ,प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे ,गणेश हाके यांच्यासह दोन्ही जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे व शैलेश लाहोटी यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment