भारताचा धावांचा डोंगर

Friday, October 5, 2018

राजकोट :
 कर्णधार विराट कोहली व अष्टपैलू रवींद्र जडेजा यांची शतके आणि यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतचे हुकलेले शतक भारताच्या डावाचे वैशिष्ट ठरले. कोहलीने १० चौकारांनिशी १३९ धावा फटकावत शतकांच्या यादीत भर घातली. तर, जडेजाने प्रत्येकी ५ चौकार व षटकारांनी कसोटीतील पहिल्यावहिल्या शतकाची नोंद केली. मात्र, पंत शतकापासून केवळ ८ धावांनी वंचित राहिला. या तिघांच्या फटकेबाजीवर भारताने ९ बाद ६४९ धावांवर डाव घोषित केला.

राजकोट येथे सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने धावांचा डोंगर उभारून वेस्ट इंडिजसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. पहिल्या डावात भारताने ९ गड्यांच्या बदल्यात ६४९ धावा ठोकल्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची दमछाक झाली असून पहिल्या डावात त्यांना ६ गड्यांच्या बदल्यात अवघ्या ९४ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे भारताने अजूनही वेस्ट इंडिजवर ५५५ धावांची आघाडी घेतलेली आहे. 

आज दिवसभराचा खेळ संपला तेव्हा रोस्टन चेस २७ धावांवर तर किमो पॉल १३ धावांवर खेळत होते. भारताकडून मोहम्मद शमीने दोन तर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला. पहिल्या डावात वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. वेस्ट इंडिजचा संघ खेळायला आल्यानंतर दुसऱ्याच षटकात मोहम्मद शमीने कर्णधार ब्रेथवेटला तंबूत पाठवलं. अवघ्या दोन धावा करून ब्रेथवेटला माघारी जावं लागलं. ब्रेथवेटसोबत सलामीला आलेल्या कायरन पावेललाही जास्त काळ मैदानावर टिकाव धरता आला नाही. अवघी एक धाव करून तो शमीच्याच चेंडूवर पायचीत झाला. 

वेस्ट इंडिजच्या संघाला डाव सावरण्याची भारतीय गोलंदाजांनी जराही संधी दिली नाही. सुरुवातीचे दोन गडी झटपट बाद केल्यानंतर आर. अश्विनने होपला अवघ्या दहा धावांत गुंडाळले. त्यानंतर थोड्या अंतराने शिमरॉन हेटमायरही १० धावा करून तंबूत परतला. तो धाव बाद झाला. तर सुनील एम्ब्रिसला जडेजाने अवघ्या १२ धावांवर बाद केलं. कुलदीप यादवनेही टिच्चून गोलंदाजी करत शेन डॉरिचला १० धावांवर खेळत असताना त्रिफळाचीत केलं. 

पृथ्वी, विराट, जडेजाचे शतक 
वेस्ट इंडिजपुढे ६४९ धावांचा डोंगर रचणाऱ्या भारतीय संघाने राजकोट कसोटीत शतकांची दिवाळी केली. पृथ्वी शॉने पदार्पणातच १३४ धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहलीने १३९ धावा ठोकल्या. अष्टपैलू फलंदाज रवींद्र जडेजानेही नाबाद शतक ठोकत भारताच्या धावसंख्येत भर घातली. विशेष म्हणजे होमग्राऊंडवरील त्याचं हे पहिलच शतक आहे. या तिघांशिवाय ऋषभ पंतने ९२ आणि चेतेश्वर पुजाराने ८६ धावा केल्या. 

मोहम्मद शामीने वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांना बाद करत २ बाद ७ अशी नाजूक परिस्थिती केली. मधल्या फळीतील शाही होप्स (१०), शेनॉन हेटमायर (१०), सुनील ॲम्रीस (१२) आणि शेनॉन डॉर्विच (१०) खेळपट्टीवर फार काळ तग धरू शकले नाही. दिवस अखेर रोस्टन चेस आणि किमो पॉल अनुक्रमे २७ आणि १३ धावांवर खेळत होते. भारताकडून मोहम्मद शामीने सर्वाधिक २ तर, आर. अश्विन, रवींद्र जडेजा व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ बळी घेतले. फलंदाजीत चुणूक दाखवणाऱ्या जडेजाने वेस्ट इंडिजच्या एका फलंदाजाला धावचीत करत आपली क्षेत्ररक्षणातीलही चुणूक दाखवली..

No comments:

Post a Comment