नांदेड-
शहरापासून जवळच असलेल्या जूनाकौठा भागात असलेल्या साईबाबा मंदिर परिसरात गोदापात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. जीवरक्षक दल व पोलिसांनी या तिघांचा शोध घेवून त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. ही घटना शनिवारी (ता. 4) दुपारी एकच्या सुमारास घडली.
शहरातील शिवनगर भागातील शुभम गणेश जाधव (वय 12), आनंद मारोती केंद्रे (वय १५), शुभंम संजय जगताप (वय 15) हे तिघेजण गोदावरी नदीकाठावर साईबाबा मंदिराला दर्शनासाठी गेले होते. यावेळी मंदिराला लागूनच असलेल्या गोदावरी नदी पात्रात पोहण्यास उतरले. परंतु पाण्याचा अंदाज व पोहता येत नसल्याने ते तिघेही बुडाले. ही माहिती जीवरक्षक व मंदीर परिसरात असलेल्या काही सुज्ज्ञ नागरिकांना आणि पोलिसांना समजताच त्यांनी शोध मोहीम सुरू केली. नदीपात्रात उतरण्यापूर्वी त्यांनी आपले दप्तर नदीकाठावर ठेवले होते. सय्यद नूर इकबाल व त्यांच्या पथकाने गोदावरी पात्रात शोधाशोध सुरु केली आणि एका तासातच त्यांचे मृतदेह तराफ्यावरुन बाहेर काढले. या तिघांचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस या घटनेचा तपास करत असून, शिवनगर भागातील राहणाऱ्या या तिन्ही शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना लगेच पाचारण केले. उत्तरीय तपासणीनंतर त्यांचे मृतदेह आज सायंकाळी त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. अशी माहिती शासकिय रूग्णालयातून महिला पोलिस उपनिरीक्षक संगिता कदम यांनी सांगितली.

No comments:
Post a Comment