वडार समाजाला लवकरच आरक्षण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Monday, December 17, 2018

सोलापूर :हलाखीचे जीवन जगत असणाऱ्या वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढून या समाजाला आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली . आज ज्या जागेवर समाजाच्या वस्त्या आहेत ती जागा त्यांच्याच मालकीची करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले .

वडार समाजाचा मेळावा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते .केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला .पंढरपूरच्या विठू माऊलीचा रथ वडार समाजाशिवाय पुढे जात नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा रथ या समाजाला सोडून कसा पुढे जाईल ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला . राज्य सरकार कायम समाजाच्या पाठीशी उभे आहे. वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढू ,असेही ते म्हणाले .गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांचा सामना करणाऱ्या वडार समाजाच्या वेदना व दुःख दूर करणे हे माझ्या सरकारचे कर्तव्य आहे. विधाते समितीचा अहवाल मंजूर झाला तर वडार समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे आठवले यांनी यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली .वडार समाजाची प्रगती करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू .बेघर व्यक्तींना घरे बांधून देऊ. वडार समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी 100 कोटी रुपये देऊ, ही घोषणा करतानाच समाज व सरकार यांच्यात व्यवस्था उभी रहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .यासाठीच महाराष्ट्र समन्वय समितीची घोषणा आपण करत असून विजय चौगुले यांना या समितीचे अध्यक्षपद देऊन त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

No comments:

Post a Comment