आम्हाला गांधींचा राम हवा, नथुरामांचा राम नको वसमत येथे कन्हैया कुमारचा संघावर हल्लाबोल

Tuesday, December 11, 2018
वसमत / प्रतिनिधी :- देशात राम मंदिराच्या नावाखाली आराजकता माजवली जात आहे. बाबरी मस्जिद ही राम मंदिर बांधण्यासाठी पाडलेली नसून भाजपाला सत्तेत येण्यासाठी ती पाडण्यात आली आहे, असा गंभीर आरोप करत आम्हाला महात्मा गांधीजींचा राम हवा, नथुराम गोडसेंचा नको, असे म्हणत आरएसएसच्या कुण्या एका व्यक्तीचे नाव सांगा ज्यांती स्वातंत्र्य लढ्‌यात आपले योगदान दिले, असा सवालही विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी संविधान बचाओ सभेत बोलताना सोमवारी उपस्थित केला. 


येथील जिल्हा परिषद मैदानावर दुपारी 3 वाजता विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांच्या संविधान सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, प्रमुख उपस्थिती म्हणून बाबाजानी दुर्राणी, ऍड. राजेश क्षिरसागर, मुनीर पटेल यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना कन्हैया कुमार म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात जनतेचे नाही पण मोदी-शहांचे अच्छे दिन आले आहे. 

गरीबी, बेरोजगारी वाढत असताना भाजपा पदाधिकाऱ्यांची संपत्तीही वाढत आहे. 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 21 व्या शतकाला साजेशी चर्चा होणे गरजेचे असताना मोगल काळातील प्रश्नांवर चर्चा होत आहे. 28 साल जुना असलेला राममंदिराचा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर उकरून काढला जातो. बाबरी मस्जिद ही राम मंदिर बांधण्यासाठी नाही तर सरकार स्थापन करण्यासाठी तोडल्याचा आरोप कन्हैया कुमार यांनी केला असून हे रामाचे नसून नथुरामाचे भक्त असल्याचे सांगितले. 

राम मंदिर बांधण्यासाठी कॉंग्रेस विरोध करत आहे अशा वावड्या उठविल्या जात आहेत. लोकांना बेरोजगार करणारी नोटबंदी करताना, जीएसटी लागू करताना, कॉंग्रेसने विरोध केला नाही का, एकीकडे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांना पप्पु म्हणून हिनवत असताना कॉंग्रेसमुळे राम मंदिराला कसा काय विरोध होवू शकतो, असा सवालही कन्हैया कुमार यांनी केला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकाही व्यक्तींनी स्वातंत्र्य लढ्‌यात आपले योगदान दिले नाही. कुणी असेल तर त्यांचे नाव सांगा असे आवाहनही त्यांनी केेले. आज हिंदू धर्म धोक्यात नसूल संविधान धोक्यात आहे. पंतप्रधान हिंदू आहेत. 20 राज्यात त्यांची सरकार आहे. पण हिंदू-मुसलमान असा वाद पेटवून दिशाभूल केली जात आहे. आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या स्वप्नातील भारत बनवायचा आहे. 

पण हे सरकार सुट, लूट, जूट यांचे आहे. आपल्याला पार्ट टाईम पंतप्रधान मिळाले असून विदेशी फिरणे ही त्यांची योजना आहे. सुट वाल्या लोकांनी आपण केलेली लूट लपविण्यासाठी तुमच्या डोक्यात खोट्या गोष्टी भरल्याचेही त्यांनी सांगितले. देशात शेतकऱ्यांना, स्त्रियांना सन्मान मिळत नाही. 

3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरूणांसाठी मात्र पकोडा योजना राबविण्यात आली. तर चोरांसाठी भगोडा योजना राबविण्यात आल्याचेही ते म्हणाले. तब्बल 2 तास उशिरा सुरू झालेल्या या संविधान बचाओ सभेला हजारोंच्या संख्येने महिला, पुरूषांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे कन्हैया कुमार यांच्या े54 मिनीटांच्या भाषणात एकही व्यक्ती जागेवरून हालले नाही.

राम मंदिरासाठी कोर्टाच्या निर्णयाची गरज नाही, मग आरक्षणासाठी का ?
राम मंदिराचा निर्णय हा न्यालयात प्रलंबित असताना राम मंदिर बांधण्याच्या गोष्टी सरकारकडून केल्या जातात. पण राज्यातील मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी कोर्टाकडे बोट दाखविल्या जाते. मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या आक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर भाजप सरकार मराठा आमदारांना मतदारांच्या घरी पाठवून आम्ही तर आरक्षण दिले पण तो प्रश्न कोर्टात गेल्यामुळे प्रलंबित आहे, असे सांगेल पण राममंदिराचा मुद्दा कोर्टात असताना न्यायालयाच्या निर्णयाची वाट का पाहिली जात नाही. शेवटी तुमच आमच नात काय जय शिवाजी, जय भिमराय अशी घोषणी कन्हैया कुमार यांनी मराठीतून दिली.

No comments:

Post a Comment