१० ऑक्टोबरपासून 3 लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण : कौशल्यविकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर

Thursday, October 4, 2018

नवी दिल्ली, दि. ३ : येत्या १० आॅक्टोबरपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाणार असून याचा लाभ तीन लाख युवकांना होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजीराव  पाटील-निलंगेकर यांनी आज येथे दिली.

केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्यावतीने आज देशातील विविध राज्यांच्या कौशल्य विकास मंत्र्यांची परिषद आयोजित करण्यात आली.यावेळी श्री.संभाजीराव पाटील-निलंगेकर बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतराव हेगडे होते. श्री.संभाजीराव पाटील-निलंगेकर म्हणाले, शेतकऱ्यांना कृषी आधारित कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्यामुळे गावामध्येच रोजगार निर्मिती होईल. शेतकरी कुटुंबातील तरुण-तरूणींना याचा लाभ होईल. यासाठीची संपूर्ण तयारी महाराष्ट्र शासनाकडून झाली असून येत्या १० तारखेपासून याची सुरुवात होणार असल्याची माहिती श्री.संभाजीराव  पाटील-निलंगेकर यांनी बैठकीत दिली. हे प्रशिक्षण ३४ जिल्ह्यात टप्प्या-टप्प्याने होणार आहे. याअंतर्गत शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या उपकरणाच्या दुरूस्तीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णत: मोफत असणार आहे.

राज्यात 6 कौशल्य आधारित विद्यापीठे स्थापणार
महाराष्ट्रात 6 कौशल्य आधारित विद्यापीठे उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असून यापैकी चंद्रपूर येथे वन आधारित कौशल्य विद्यापीठ तर नवी मुंबई येथे सायबर सुरक्षा विद्यापीठ उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री.संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी यावेळी दिली. चंद्रपूर येथे उभारण्यात येणाऱ्या वन आधारित कौशल्य विद्यापीठाचा कायदा लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच 4 कौशल्य आधारित विद्यापीठाबाबत आंतरीक कार्यवाही सुरूआहे. 

‘येस’ रोजगार योजना राज्यात सुरू करणार
युवा सशक्तीकरण योजना (युथ एम्पावरमेंट स्कीम (येस)) राज्यात लवकरच सुरू करणार असल्याची माहिती श्री.संभाजीराव  पाटील-निलंगेकर यांनी दिली. याअंतर्गत बदलत्या काळानुसार रोजगारात बदल होत चाललेले आहेत. यामुळे रोगारातही बदल होत आहेत. त्यानुसार प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. ‘येस’च्या माध्यमातून या बदलत्या रोजगाराची माहिती युवकांपर्यत पोहोचविण्यात येणार असल्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे श्री.संभाजीराव  पाटील-निलंगेकर म्हणाले.
स्टार्टअप यात्रा तरूणांसाठी उपयुक्त 
आजपासून महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप यात्रेची सुरूवात झाली असून या माध्यमातून नवउद्योजक तयार होतील. या उद्योजकांमार्फतही भविष्यात रोजगार निर्मित होईल, असा विश्वास व्यक्त करीत श्री.संभाजीराव  पाटील-निलंगेकर  म्हणाले,महाराष्ट्र राज्य सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे राज्य तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकीत आहे.

आजच्या बैठकीत त्यांनी राज्यातील आयटीआयची स्थिती सांगून या माध्यामातून 85 % रोजगार निर्माण होत असल्याचे सांगितले. औद्योगिक क्षेत्राशी निगडित 4 लाख तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी औद्योगिक संस्थांशी करार करण्यात आले. औद्योगिक संस्थांमध्ये होणाऱ्या कामावर आधारित अभ्यासक्रम असल्यामुळे लाभार्थ्यांना याचा थेट लाभ होत असल्याचेही कौशल्य विकास मंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 


Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment