नांदेड, दि. 15 : भेदभाव विसरुन प्रत्येकाला न्याय देण्यासाठी आपण सर्वजण एकजूटीने काम करु या, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 71 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेश देतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या समारंभात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, समाज कल्याण सभापती श्रीमती शिलाताई निखाते, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा परिषद, महापालिकेतील पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटूंबीय, माजी सैनिक, विविध विभागांचे अधिकारी , कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शुभेच्छा संदेशात पालकमंत्री श्री. कदम म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा करीत असतांना स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला अशा लाखो महामानवांचा आदर्श आपल्या समोर आहे. राज्याच्या विकासाबरोबर नागरिकांच्या मुलभूत गरजा तसेच समाजातील विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. लोकप्रतिनिधींनी पक्ष विसरुन जनतेच्या सेवेसाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे सांगून त्यांनी सर्वांना भारतीय स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment