लोकसभेच्या निवडणुकीत भाजप १०० जागा गमावणार

Sunday, December 23, 2018


बंगळूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप लोकसभेच्या किमान 100 जागा गमावेल, असे भाकीत स्वराज इंडिया पक्षाचे अध्यक्ष आणि निवडणूकतज्ञ योगेंद्र यादव यांनी शनिवारी केले.


येथे पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना यादव यांनी त्यांच्या भाकिताच्या पुष्टीसाठी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतील भाजपच्या पीछेहाटीचा दाखला दिला. मोदी आणि भाजपविषयी जनतेचा भ्रमनिरास झाल्याचे त्या निवडणुकांनी दाखवून दिल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि भाजप या पक्षांमधील फरक दाखवण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस आत्मसंतुष्ट आहे. तो पक्ष अजूनही झोपेतून जागा झालेला नाही. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजय निश्‍चित असल्याचे कॉंग्रेसला वाटत असेल तो पक्ष मुर्खांच्या नंदनवनात राहत आहे.

त्याउलट, भाजपमध्ये आत्मसंतुष्टी नाही. भाजप देशासाठी घातक असला तरी सक्रिय आहे, असे ते म्हणाले. महाआघाडीत देशाचे भविष्य असल्याचे वाटत नाही. मोदींना विरोध असणाऱ्यांना पाठिंबा हे राजकारण देशासाठी योग्य नाही, असे म्हणत त्यांनी महाआघाडी स्थापन करण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नाबद्दल प्रतिकूल मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment