पाली (राजस्थान) : भाजप केवळ एखाद्या विशिष्ट जाती व धर्माचे नेतृत्व करणारा पक्ष नसून, येथे सर्वांना समान स्थान असल्याचे प्रतिपादन पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी येथे केले आहे. नेहरू-गांधी घराण्यातील चार पिढ्यांनी देशावर सत्ता गाजविली. मात्र, अद्यापही मागासवर्गीयांना न्याय मिळाला नाही, अशी टीका त्यांनी केली.
राजस्थानच्या पाली येथे ओबीसी संमेलनाला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सबका साथ सबका विकास'चा नारा दिला. विकासात सर्वांची भागीदारी महत्त्वाची आहे. भाजपमध्ये माळी, गुर्जर, जाट, दलित, आदिवासी, मागासवर्गीय अशा सर्व समाजाला स्थान आहे. त्यामुळे भाजपवर विशिष्ट समाजाचा पक्ष असल्याचा ठपका नाही, असे त्यांनी ठासून सांगितले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानच्या जनतेने सर्वच मतदारसंघांत भाजपच्या खासदारांना निवडून दिले. तेव्हापासून मोदींनी समाजाचा विकास घडविण्याचा विडा उचलला. या प्रवासात त्यांनी कदापि मागे वळून पाहिले नाही, असेही अमित शाह यांनी नमूद केले. केंद्र सरकारने मागासवर्गीय (ओबीसी) आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. ओबीसी समाजाला न्याय देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल ठरले, असे सांगत त्यांनी आपल्याच सरकारची प्रशंसा केली आहे. मुद्रा योजना, अन्नपूर्णा रसोई योजना, भामाशाह योजनांवरही अमित शाह यांनी प्रकाश टाकला..

No comments:
Post a Comment